🌹
🌷
" नामप्रेमचिंतन "
🌹
🌷
शंका : कोजागिरी पौर्णिमा संदर्भात थोडंसं सांगावे!
श्रीराम!
संपूर्ण लौकिक विश्व विषयनिद्रेत लोळत असतांना विश्वात्म्याच्या स्मरणांत कोण पूर्ण जागं आहे, हे बघण्याचा पूर्णतम पर्वकाळ म्हणजे कोजागरी पौर्णिमा! परमार्थ म्हणजे अखंड सावधानता! या सावधानतेला एक अध्यात्मिक समकक्ष शब्द आहे "जागृती"! सदाचरणात्मक सावधानी, सतत जागृत अवस्था हीच खरी साधना, याची शिकवण देणारी ही पौर्णिमा! गुरूपौर्णिमा उत्सवातील प्रवचनांत आपण संपूर्ण १२ नव्हें तर १३ पौर्णिमांचं अध्यात्मिक अधिष्ठान यांवर चिंतन केलं. या १२-१३ पौर्णिमांपैकी एक अतिदिव्यतम् पौर्णिमा म्हणजे आजची!
प्रत्येक मनुष्यात चार गोष्टी अंतर्भूत असतात, ज्यांच्या सदुपयाोगानें आपण आपलं जीवन कृतार्थ करू शकतो. त्या चार गोष्टी म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार! या चारही लेव्हलवरून जेंव्हा आपली अखंड जागृत अवस्था राखली जाते, तेंव्हा शरद पौर्णिमेसारखा पूर्णानंद अखंड अनुभवता येतो!
आजचा सुखदुःखाच्या गर्तेत पुरता अडकलेला मनुष्य या पूर्णानंदाच्या जवळपाससुद्धां फिरकू शकत नाही. एखाद्या माणसाला चार दोरांनी घट्ट बांधून चार दिशांकडे एकाचवेळी ओढलं तर कसं होईल? तसं काहीसं विषयी माणसाचं झालं आहे की, ज्या मन, बुद्धी, चित्त, अहंकाराला जागृत करायचं आहे त्याच चार बंधनात तो करकचून स्वतःहून अडकून बसला आहे. आणि या चार पाशातून अडकून त्यांच्यावर स्वामित्व गाजवण्यासाठी जागृतपूर्वक जी साधना करावी लागते, तिला म्हणतात साधनचतुष्ट्य!!! आपलं पूर्ण अंतःकरण पूर्णब्रम्ह परमात्म्याला समर्पित केल्यावर काय होतं, याची दोन महानतम् उदाहरणं म्हणजे महर्षी वाल्मिकी आणि भक्ती महाराणी शबरी! याच दोन दिव्य रामभक्तांचा जन्मदिन म्हणजे ही शरद पौर्णिमा, वाल्मिकी पौर्णिमा!
वाल्मिकींचं पूर्वायुष्य चोऱ्या, लुटमार करण्यात, तर शबरीचं बालपण लौकिक अर्थानें कनिष्ठ वर्ग मानल्या जाणाऱ्या भिल्ल जमातीत. परंतु, दोघांच्या आयुष्यात एक जागृतीचा क्षण आला आणि त्यांनी तो आजीवन धारण केला. याच सततं जागृतावस्था ची परिणती म्हणजे त्यांना रामभक्तांमध्ये अढळ स्थान प्राप्त झालं! अर्थात ही जागृत अवस्था येण्यासाठी कुणी समर्थ सद्गुरू भेटावा लागतो. वाल्याकोळीला वाटमारी करतांना नारदमुनींच्या रूपाने रामभक्तीचा वाटाड्या भेटला.
नारदानें त्याला जागं केलं आणि मतंग मुनींनी लहानशा शबरीला जागं केलं. शबरीला तिच्या सद्गुरूंनी रामदर्शन घडेल, त्यासाठी भक्तियुक्त नामस्मरण सुरु ठेव, असे सांगितले. यात रामदर्शन कधी घडेल, हे सांगितले नव्हते. तिने आयुष्यभर न थकता अव्याहत म्हणजे नामाचा जागर सुरु ठेवला. इतकी वर्षे झाली नाम घेऊन, काही उपयोग झाला नाही, असे म्हणून शबरी साधनेपासून परावृत्त झाली नाही. 'सतत जागृत राहून साधनस्थ' राहणे हे भगवद्कृपेसाठीची महत्वाची अट सांगणारी ही पौर्णिमा कोजागरी पौर्णिमा! या दोन सद्गुरूंनी दोन महान अधिकारी भगवद्भक्तांना अखंड जागर शिकवला.
यांतून बोध घेऊन आपण विचारावं 'को जागरी?' किंबहुना, आपले सद्गुरूच सतत कोणत्या ना कोणत्या मुखातून, प्रसंगातून आपल्या शिष्यांना विचारतात, 'कोण जागं आहे?. जो जागा होण्याची आंतरिक तळमळ दाखवतो, त्याच्या अंतःकरणातील मलीन जागा भगवंताच्या प्रगटीकरणासाठी पूर्णपणे शुध्द होते. आणि मग भगवंताची जागा वैकुंठात राहत नसून भक्ताच्या अंतःकरणात निर्माण होते. भगवंताची जागा भक्ताच्या ह्रदयकमली; तर भक्ताची जागा भगवंताच्या चरणकमली!
ही पौर्णिमेसारखी पूर्णावस्था साधण्यासाठी आपल्या सद्गुरूंनी अनुग्रहाच्या रुपानें आपल्याला जी जागृती दिली आहे, त्या नामानुसंधानांत राहून कर्तव्य करावें, रामचरणी जागा नक्कीच मिळेल!
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

