Tuesday, August 21, 2018

मृत्यूचा उत्सव


🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷



शंका : तुम्ही सद्गुरुजवळ मृत्यूचा उत्सव शिकू शकला नाहीत तर नदी समोर असूनही जीवनभर तुम्ही पाण्यापासून वंचित राहिलात असंच म्हणावं लागेल. मृत्यूचा उत्सव याचा अर्थ सांगाल का? 

श्रीराम! 

काही माणसं बऱ्याच वर्षांनी पंढरपूरला गेले. सकाळी गावाहून निघाल्यावर पंढरीला पोचायला रात्रीचे ९ वाजले. दिवसभराची भूक होती म्हणून अगोदर मंडळी हॉटेलमध्ये जेवायला गेली. नंतर विठ्ठल मंदिराबाहेर असलेली दुकानं पाहत राहिली, थोडीफार खरेदी करत राहिली. हे सगळं करण्यात शेजारती होऊन मंदिर बंद झालं. दुसऱ्या दिवशी ८ वाजताची बस पकडण्याअगोदर पहाटेच दर्शन करू असं ठरवलं. पण दिवसभरच्या प्रवासाने सकाळी साडे सात वाजता जाग आली. परिणामी, दर्शन न करता परत यावे लागले. 


जन्मासी येउनी पहा रे पंढरी
नाचा महाद्वारी देवापुढे || असं संतमंडळी वारंवार सांगत असुनही आपण लौकिक गोष्टींसाठी स्वार्थी लोकांपुढे नाक घासतो, परिस्थितीपुढे नाचतो. आणि शेवटी न्यायला गाडी आली की रिकाम्या हाताने परत जातो. हे टाळण्यासाठी वरील वचन आचरणात आणणे अनिवार्य आहे. 

विनोबा भावे म्हणत, ‘साधकाने देहाच्या मृत्यूपूर्वीचे मरण एकदा मरून पाहावे.तुकोबादेखील अभंगातून म्हणत की, मी माझ्या मृत्यूचा अनुपम्य सोहळा पहिला!
माणगंगेच्या काठी भलं, गांव वसलं हे गोंदवलं |
रूप अनुपम्य हे अवतरलं, चालतं बोलतं ब्रम्ह इथे आलं || 
हे परब्रम्हाचे चैतन्य अनुभवायचे असेल तर "गोंदावले वास" जरूर करावा, पण तिथे गेल्यावर "रामनामी श्वास" घ्यावा हे महत्वाचे आहे. आणि रामनामी श्वास घेण्यासाठी लौकिकाचा ध्यास सुटणे ही अट आहे. हा लौकिकाचा ध्यास सुटणे म्हणजे मृत्यूचा उत्सव शिकणे होय.

लौकिकाचा ध्यास सुटण्याची महत्वाची खुण म्हणजे मीपणामरून जाणे. माझे घर, माझी गाडी, माझी नोकरी, माझा पैसा, माझे कुटुंबीय, माझी प्रतिष्ठा या सर्व ममत्वाचा, देहबुद्धीचा कायमचा त्याग कसा करावा, हे सदगुरूंकडून शिकणे म्हणजे मृत्यूचा उत्सव शिकणे!

माझ्या मनाला आवडेल तसं घडावं, मनाला बोचेल, त्रास होईल असं घडू नये असा मनाच्या आहारी गेलेला देह अविनाशी अखंड सुखाचा अनुभव कधीच घेऊ शकत नाही. त्या अद्वितीय अनुभवासाठी आसक्त मनाला जाळणे जरूर आहे. मन माझे मरोनी गेले l मज केले अमर || ही संतांची दिव्यानुभूती आपल्यालादेखील येण्यासाठी हट्टी, दुराग्रही मन पूर्णपणे नाहीसे करणे म्हणजे आसक्तीच्या मृत्यूचा उत्सव करणे होय.

साधू, संत, योगी, मुनी यांना याचे पूर्ण ज्ञान असते की या भौतिक जगात सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे देहबुद्धीचा मृत्यु असते. मृत्यु हे समाधीसुखाचे साधन आहे. खरे पहिले असता मृत्यु हे मोक्षप्राप्तीचे पहिले पाउल आहे. मृत्यु ही एक अशी तपस्या आहे की तिला कोणताही काम, कोणतीही अप्सरा, कोणताही मोह, कोणताही विकार विचलित किंवा भंग करू शकत नाही. कारण मृत्यु ही अशी सर्वश्रेष्ठ मोहिनी आहे की जिच्या अधीन झालेला मनुष्य भगवत्चरणी लीन झाल्यामुळे त्याला स्वर्गसुखादी मोहाकडे बघावे सुध्दा वाटत नाही.

ब्रम्हज्ञानी, भगवद्भक्त किंवा अधिकारी संत या मृत्युचे महत्व ओळखून तिच्यापासून पळण्याचा प्रयत्न न करता आनंदाने तिला आपल्याजवळ बोलावत असतात. आणि याहीनंतर देहाच्या पातळीवर जगत्कार्य पूर्ण झाल्यावर महात्मे दैहिक मृत्युला आलिंगन देऊन लौकिक कार्यापासून स्वेच्छेने निवृत्त होतात.

देहबुद्धी नेणो काही, दास अंकित रामापायी | यांत समर्थांनी देहबुद्धीचे, ममत्वाचे मरण झाल्यानंतर दास्यत्व आणि शरणागती ही अवस्था अनुभवता येते, हा स्वानुभव सांगितला आहे. सद्गुरु किंवा भगवंत कृपा करतो म्हणजे काय तर आपलं सर्वकाही काढून घेतो. असं सर्वकाही समर्पित करण्याची कुणाची तयारी आहे? कुणी वस्तुत, कुणी व्यक्तीत, कुणी प्रतिष्ठेत, प्रसिद्धीत तर कुणी सिद्धीत अडकला आहे. ही सगळी आस सोडून सेवाभावाने प्रपंच करायला शिकणे म्हणजे मृत्यूचा उत्सव शिकणे!

दीन ब्रम्हानंद प्रार्थितसे भावे, मन लय व्हावे रामरूपी | यामध्ये पू. ब्रम्हानंद महाराजांनी आपल्या सद्गुरुंकडे विकारी मनाच्या मृत्युचे साकडे घातले आहे. कारण आधी मरण, मग शरण आणि शेवटी स्मरण!

ज्याला खरा साधक व्हायचे आहे त्याने एक महत्त्वाचा अध्यात्मसिद्धांत ध्यानांत घ्यावा की, जोपर्यंत देहबुद्धीचे मरण साधणार नाही, तोपर्यंत खरी शरणागती नाही; आणि खऱ्या शरणागतीशिवाय खरे नामस्मरण नाहीच!

एका जनार्दनी शरण, करी माहेराची आठवण || यामध्ये नाथांनी स्पष्टपणे आठवण म्हणजे स्मरणाप्रत जाण्याचा अटळ टप्पा सांगितला आहे. स्मरणाअगोदर शरण सोहळा; आणि शरणागतीसाठी मीपणाचा मरणसोहळा!
स्मरण = मरणोत्तर शरण
आता आपल्यासारख्या विषयप्रपंचात पुरता अडकलेल्या माणसाला जर देहबुद्धीचे मरण साधता येत नसेल तर आपण तिला बेशुध्द तरी केले पाहिजे. ही बेशुद्धी म्हणजे किमान नामाला बसण्याअगोदर काही काळाकरिता आपल्या देहाचे विचार आणि देहासंबंधीच्या व्यक्ती, वस्तूंचे विचार सोडून देणे. हे साधले नाही तर शरण जाता येणार नाही. आणि शरणागतीशिवाय घेतलेले नाम हे नामोच्चारण ठरते, नामस्मरण नाही.
वर सांगितलेली लौकिक बेशुद्धी दिवसभरातून जेवढा जास्त वेळ साधता येईल, तेवढा वेळ आपल्याला नामस्मरण साधेल.

काही साधकांनी मागे एकदोन वेळा विचारले होते की, ‘एखाद्या वेळी नामस्मरण झाल्यावर किंवा नाम घेतांना आत्यंतिक आनंदाने मन भरून येतं, कंठ सद्गदित होतो. पण असं नेहमी होत नाही, कारण काय?’
याचं कारण हेच की ज्या ज्या वेळी आपण देहबुद्धीला बेशुध्द करून नाम घेतलं त्या त्या वेळी त्या नामाला शरणागतीची जोड मिळाली. परिणामी ते खरं नामस्मरण झालं. आणि खऱ्या नामस्मरणाची फलश्रुती म्हणजे प्रेमाश्रू!

संत, सत्पुरुषांना नाम आठविता सद्गदित कंठ हा अनुभव सतत येत असतो, याचे कारण त्यांनी त्यांच्या देहबुद्धीला आपल्यासारखं तात्पुरतं बेशुध्द केलेले नसून तिचे मरण साधलेले असते. आपल्याला या अनुभवाप्रत पोचण्यासाठी अगोदर देहबुद्धीला मधूनमधून बेशुध्द करून शेवटी तिचा मरणसोहळा साधावा लागेल. मी पण माझे नेले हिरोनिया ।' अशा अवस्थेपर्यंत जाण्याची सुरुवात आपली वस्तू, व्यक्ती, पदार्थ आणि मान, लौकिकाची हौस याला सोडण्यानेच होणार. अन्यथा देहाचा मरणसोहळा होईल, पण मीपण मात्र वासनेच्यारूपाने जिवंतच राहील. याची चाड बाळगून आपण सदगुरूंकडून हा मरणोत्सव शिकण्याचा मनापासूनआचरणात्मक प्रयत्न करूया! 
मरणा भीणे भीती जीव । - बद्ध मनुष्य
आम्हा मरण्याचा उत्सव ।। - सिद्ध महात्मा
कधी मरु कधी मरु। कधी देहाते विसरू ।। - उत्कंठा लागलेला मुमुक्षु



🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏