Saturday, March 18, 2023

"आणिक नका पडू गाबाळाचे भरी । तेथे आहे थोरी नागवण ।।"

शंका- "आणिक नका पडू गाबाळाचे भरी । तेथे आहे थोरी नागवण ।।" याचा अन्वयार्थ सांगाल का? ➡ श्रीराम! जगामध्ये तीन प्रकारची माणसे असतात. बहुतांश लोकांचा तमोगुण अतिशय प्रबळ असतो; त्यापेक्षा कमी लोकांचा रजोगुण प्रबळ असतो; तर फार कमी लोकांचा सत्वगुण प्रबळ असतो. आणि या तिन्ही गुणांच्या पलीकडे त्रिगुणातीत असलेला एक दुर्मिळ वर्ग असतो, ज्यांना आपण संत म्हणतो. ज्या सुखासाठी प्रत्येक जीव आसुसलेला असतो, त्या सुखाचे धनी केवळ आणि केवळ संतमहात्मेच असतात. त्यांना हे सुख मिळवण्यासाठी जे साधन करावे लागले त्यानंतर त्यांनी तुम्हाआम्हासाठी एक महत्वाचा धडा दिला. तो हा की अविनाशी सुख हवे असेल तर विनाशी गोष्टींच्या मागे लागू नका. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी तर स्पष्टपणे, परखडपणे सांगितले: आणिक नका पडू गाबाळाचे भरी । ‘गाबाळ’ या एकाच शब्दात तुकाराम महाराज संसारातील सर्व त्याज्य वस्तूंचा उल्लेख करतात. गाबाळ म्हणजे घाण, गाबाळ म्हणजे कचरा. गाबाळ म्हणजे उकीर. आपण स्वतःचे सुंदर, प्रशस्त घर असावे यासाठी काबाडकष्ट करतो. अनेक वर्ष राबल्यानंतर आपण कमावलेला पैसा बिल्डरला देऊन घर खरेदी करतो. तेंव्हा जर त्या बिल्डरने आपल्याला घर म्हणून उकिरडा दिला तर आपण तिथे राहू का? याचे उत्तर स्वाभाविकपणे ‘नाही’ हेच असणार आहे. परंतु, आपण आयुष्यभरची कमाई देऊन उकिरड्यावरच राहत आहोत, याची आपल्याला जाणीव नाही. अनेक जन्मानंतर आपण कमावलेला लाखमोलाचा नरदेह आपण सुखी जीवनाच्या अपेक्षेने विकाररूपी बिल्डरकडे दिला आणि त्याने त्यामोबदल्यात आपल्याला तमोगुणांचा उकिरडा दिला. दुर्दैव हे की आपण त्या उकिरड्याला महाल समजून तिथे आनंदाने राहत आहोत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, “आणिक नका पडू गाबाळाचे भरी ।” यातील ‘आणिक’ शब्द फार मार्मिक आहे. आणिक म्हणजे आणखी किंवा आता तरी. आता म्हणजे आजपर्यंतचे आयुष्य गाबाळाच्या कचाट्यात अडकण्यातच गेले आहे. त्यातून केवळ निराशा, दुःखच पदरी पडल्यावर आता तरी त्या घाणीत पडू नका, असा सल्ला तुकोबा देत आहेत. या संसारातील वस्तु, पदार्थ, संपत्ति, मान, प्रसिद्धी, स्वार्थाधिष्टित लोक या सर्वांनी मिळून जो एक मोठा ढीग तयार होतो, त्याबद्दल समर्थांना काय वाटते? तर, रामदास म्हणे अवघेची गाबाळी ।. मुक्ताबाईंना काय वाटते? तर उठे विकार ब्रम्ही मुळ । अवघे मायेचे गाबाळ ।। याव्यतिरिक्त नाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज सर्व संतांची प्रमाणं आपण बघितली तर लक्षात येईल की, भागवंतापासून दूर करणाऱ्या सर्व गोष्टींना संतांनी ‘गाबाळ’ म्हटले आहे. तुकोबांच्या गाथ्यामध्ये हा शब्द अनेकवेळा आलेला आहे. एकूण काय तर अध्यात्मजगत भक्तिमार्गात अडसर ठरणाऱ्या गोष्टींमध्ये पडू नका असे वारंवार सांगत असते. थोडे बारकाईने चिंतन केले तर आपल्याला ध्यानात येईल की संतांनी संसारातील या वस्तूंना गाबाळ म्हटले नाही तर त्यात असलेल्या आसक्तीला गाबाळ अर्थात घाण म्हटले आहे. संसार गाबाळ नसून त्यातील सुखत्व बुद्धी, सत्यत्व बुद्धी आणि नित्यत्व बुद्धी ही गाबाळ आहे. तिचा त्याग करायचा आहे. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की या गाबाळाच्या भरीस पडू नये, कारण तेथे आहे थोरी नागवण । संसारातील आसक्तीमध्ये आपल्या खऱ्या सुखाची थोरी म्हणजे कायमची नागवण आहे. जोपर्यंत नाशवंताला आपण आश्रय मानत राहू, तोपर्यंत अविनाशी भगवंत, अभंग समाधान कदापि मिळणार नाही. आजपर्यंतच्या वासनेच्या संस्कारांमुळे, विषयाच्या अखंड कुसंगामुळे आपल्या जीवनात अशांतीचा, अस्वस्थतेचा अंधकार पसरलेला आहे. तो अंधकार दूर होण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत: सत्संगती आणि भगवंताचे अखंड अनुसंधान. हे लाभण्यासाठी अंतःकरणापासून प्रार्थना करूया, करी तिमिराचा नाश । दीप होऊनी प्रकाश । तोडी आशापाश । करी वास हृदयी ।। पाहे गुंतलो नेणता । माझी असो तुम्हा चिंता । तुका ठेवी माथा । पायी आता राखावे ।। अशी मनापासून विनवणी केली आणि सदाचरण व सदास्मरण राखले तर ‘याचि देहि, याचि डोळा, भोगीन मुक्तीचा सोहळा’ हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. 🙏 !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Sunday, May 17, 2020

संत मुक्ताबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिंतनसेवा!

🌷🌿🌷   "मुक्ताई चिंतन"   🌷🌿🌷

श्रीराम! 

जन्माला येतांनाच जीवन्मुक्त असलेल्या अधिकारी भगवद्भक्त मुक्ताईची आज पुण्यतिथी. मुक्ताबाईच्या समग्र चरित्रातील दोन उच्चकोटीचे प्रसंग आहेत. या दोन्ही प्रसंगात मुक्ताईने भागवत संप्रदायातील दोन अत्यंत महानतम संतसत्पुरुषांना दिग्दर्शन केले आहे. त्यातील एक संत म्हणजे ज्ञानियांचा राजा असलेले ज्ञानेश्वर महाराज; तर दुसरे संत म्हणजे ज्यांच्या हाताने प्रत्यक्ष भगवंत जेवतो असे पंढरीरायाचे प्रेमभांडारी असलेले नामदेव महाराज! नामदेव महाराजांना केलेले उद्बोधन नंतर कधी बघूया. आज ज्ञानोबा-मुक्ताई हितगुज!
एखादा कीर्तनकार किंवा प्रवचनकार जेंव्हा अध्यात्मिक प्रबोधन करतो, तेंव्हा ते प्रबोधन, ते अध्यात्म चिंतन श्रोत्यांच्या मनाला भिडणारे आहे की नाही, याचा विचार त्या प्रबोधनकाराने करणे जरूर आहे. परंतु, ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण अध्यात्मिक उद्बोधन केल्यानंतर आणखी एक आढावा घेतात, जो आजच्या प्रत्येक पारमार्थिक वक्त्याने घ्यायला हवा. तो आढावा म्हणजे जे चिंतन मांडले आहे, ते श्रोत्यांच्या किंवा वाचकांच्या मनाला केवळ तेवढ्यापुरतेच भिडले आहे की त्यातून त्यांचे आचरण किंवा एकूणच साधन यांत सुयोग्य बदल होत आहे का?

ज्ञानोबांनी हा आढावा घेतल्यानंतर जेंव्हा त्यांच्या लक्षात आले की लोक अध्यात्म ऐकत नाही आणि ऐकले तरी त्यातून अपेक्षित मनोमंथन घडत नाहीये, तेंव्हा त्यातून आलेल्या उद्विग्नतेची परिणती म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःला कोंडून घेतले. अशावेळी ज्ञानेश्वर महाराजांना शांत करण्याचे, त्यांना पुन्हा जगत्कार्य करण्यासाठी प्रेरित करण्याचे अद्भुत कार्य ज्यांनी केले त्या संत मुक्ताबाई!

ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यासारख्या कोट्यानुकोटी बद्धांना माऊली बनून समजावून सांगितले, त्या ज्ञानीयांच्या राजाला समजावून सांगणाऱ्या मुक्ताईचा अधिकार काय असेल, याचा सूक्ष्म विचार करायला हवा.

ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये क्रोध, उद्वेग, अशांती यांना जिंकण्यासाठी अत्युच्च कोटीचे उद्बोधन केले, त्या ज्ञानोबांना जेंव्हा समाजाची अधोगती बघून जी बाह्यांगाने उद्विग्नता आली, तिला शांत करण्याचा अधिकार त्रिभुवनात केवळ आणि केवळ मुक्ताबाईचाच! प्रत्यक्ष निवृत्तीनाथ महाराज सद्गुरुरूपाने त्याठिकाणी उपस्थित असूनही लौकिक वय लहान असणाऱ्या मुक्ताबाई जेंव्हा ज्ञानेश्वर महाराजांना समजावतात, तेंव्हा मुक्ताई कोणत्या पदावर असतील, हे समजले पाहिजे. मुक्ताबाईचे इतर अभंग आणि ताटीचे अभंग यातील भाषाशैलीत आणि अध्यात्मिक अधिष्ठानात फार अंतर आहे. इतर अभंगात भक्त म्हणून बोलणारी बाळबोध मुक्ताबाई ताटीच्या अभंगात एक अधिकारी मार्गदर्शक वाटते.

मानसशास्त्र शिकत असतांना एक गोष्ट अभ्यासात आली होती की स्त्री ही पुरुषाच्या तुलनेत मानसिकदृष्टीने श्रेष्ठ आहे. मानसशास्त्र असं सांगतं की स्त्रीच्या शारीरिक वयात पाच मिळवले की तिचे मानसिक, भावनिक वय मिळते. ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा मुक्ताबाई देहदृष्ट्या ४ वर्षांनी लहान असली तरी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या ती ज्ञानोबांपेक्षा एक वर्षाने मोठी आहे. या भावबलाच्या आधारावर तिने आदेशात्मक सूचना केली की, “ताटी उघडा ज्ञानेश्वरा!” कदाचित आपल्याला देहरुपाने मुक्ताबाईसारखी बहिण नसेल; पण आपल्या संपर्कात आईच्या रूपाने, बहिणीच्या रूपाने किंवा पत्नीच्या रूपाने मुक्ताबाई आपल्याला दिग्दर्शन, मार्गदर्शन करत असते.

ताटी म्हणजे दरवाजा. त्याला कवाड असा देखील शब्द आहे. परंतु, कवाड दोन पटांचे असते; तर ताटी एक पटाची. आपण दोन पटांमध्ये म्हणजे द्वैतात कोंडलेलो आहोत, तर संत हे अद्वैतात स्थिर असतात. तुम्हा आम्हा आड द्वैताचे कवाड । हे ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या आमच्यासारख्या द्वैतात अडकलेल्या बद्धांना संबोधून म्हटले आहे; तर ताटी उघडा हे मुक्ताबाईने अद्वैताचा अनुभव पुरेपूर भरून उरलेल्या ज्ञानराजासारख्या सिद्ध सत्पुरुषाला संबोधून म्हटले आहे.

यांत एक अतिशय सूक्ष्म गोष्ट ध्यानांत घ्यावी की ताटी उघडणे मुक्ताईला शक्य होते, पण तिने आपल्या भावाला ती उघडायला सांगितले. यांत एका अंगाने बहिण म्हणून मर्यादा आहे; तर अध्यात्माच्या अंगाने विचार केला तर ताटी ज्याने लावली त्यानेच ती उघडली पाहिजे. कर्म हे बंधन आणि मुक्तीला कारण ठरते. ज्या कर्मामुळे आपण बंधनात आलो त्याच कर्माच्या आधाराने आपण मुक्त होऊ शकतो, असा सखोल बोध मुक्ताई देत आहे. आपला दरवाजा आपणच उघडायचा असतो. दुसऱ्याने ताटी उघडणे ही जबरदस्ती होऊ शकते. परमार्थात भगवंत, सद्गुरु, सद्ग्रंथ सर्वकाही मिळाले तरी स्वतः साधन केल्याशिवाय मुक्ति नाही, हे मर्म यांतून घेतले पाहिजे. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांना कार्यप्रवण करण्यासाठी मुक्ताबाईने मांडलेले चिंतन म्हणजे ताटीचे अभंग! मुक्ताबाईच्या एकेका शब्दात जबरदस्त सामर्थ्य आहे.
योगी पावन मनाचा। साही अपराध जनाचा ।
विश्वरागे झाले वन्ही। संती सुखे व्हावे पाणी ।
शब्द शस्त्रे झाले क्लेश। संती मानावा उपदेश ।
विश्वपट ब्रम्ह दोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।

तेंव्हा, मुक्ताबाईचे दिग्दर्शन लाभून आपण याच जन्मी मुक्त व्हावे वाटत असेल तर अगोदर तिने ज्यांना मार्गदर्शन केले त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे अनुसरण करावे लागेल. म्हणजेच सद्गुरु माझे कल्याणकर्ते आहेत, ही जाणीव ठेवून ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आणि नाम हाच देव आहे, या निष्ठेने नामात राहून नामदेव महाराजांची कृपा संपादन केली तरच मुक्ताबाई आपल्याला सच्चिदानंद स्वरुपाची ताटी उघडण्यासाठी प्रेरणा बनतील!

🙏 !!जानकी जीवन स्मरण जय जय राम!! 🙏

Friday, May 3, 2019

कृष्ण नाकाला लोणी लावतो!

शंका :

📿🌿📿      !! श्रीराम !!     📿🌿📿

लोणी चोरल्यावर बाळकृष्ण थोडे लोणी एखाद्या वासराच्या नाकाला लावीत. त्यामुळे त्या वासराला चोप मिळे. तसे खरे परमात्माच सर्व करतो पण अहंकारी माणसाच्या नाकाला लोणी लावतो व त्यामुळे त्याला दुःख भोगावे लागते!

🙏🌷🙏 ।। श्रीराम समर्थ ।। 🙏🌷🙏

याचा अर्थ नाही समजला☝🏻😒


🍚🌿   "नाकाला लोणी नको"   🌿🍚

श्रीराम!

श्रीमहाराजांच्या वरील बोधवचनात जे आलंय ना, की 'भगवंत वासराच्या तोंडाला लोणी लावतो' ते एक फार बोधप्रद रूपक आहे.
वासरू म्हणजे लेकरू. आपण सर्वजण भगवंताची लेकरं आहोत. त्या लेकरावर भक्तीमाता निरपेक्ष, निर्व्याज प्रेम करते. परंतु, भगवंत हा बापाच्या भूमिकेत असल्याने तो आपलं लेकरू जरी असलं तरी त्याने काही चूक केली, अपराध केला तर त्याला दंडित करायला मागेपुढे बघत नाही. जोपर्यंत लेकरू स्वतःला अज्ञानी लेकरू समजतं तोपर्यंत आई त्याला स्वतः जेवू घालते, बाप त्याला गर्दीच्या ठिकाणी खांद्यावर घेतो. तेच लेकरू स्वतःला शहाणं, ज्ञानी, गुणवान समजू लागलं की सद्गुरुरुपी आई कदाचित लाडाने आताही घास भरवेल, पण बाप म्हणतो आता मी तुला खांद्यावर घेणार नाही, तू तुझं पायी चाल. आणि बाप एवढ्यावर थांबत नाही. त्या लेकराला तो अजून खरा ज्ञानी झाला नाही, हे तथाकथीत ज्ञान म्हणजे त्या लेकराचा वृथा अभिमान आहे, याची त्याला जाणीव करून देतो.

लेकराने काही लहान मोठी चूक केली तर आई त्याला समजावून सांगते. परंतु, ‘मला कळतं’, माझ्याकडे इतरांपेक्षा श्रेष्ठ प्रतीचे ज्ञान, कला, गुण आहेत असा अभिमान, अहंकार ही काही लहानशी चूक नाही. हे आत्मघातकी महापाप आहे. अशावेळी आईला वाईट वाटण्यापलीकडे काही करता येत नाही. ही आई म्हणजे भक्तीमाता म्हणजेच आपले सद्गुरु आपल्यातील अहंकार बघून आपल्याला वेगवेगळ्या निमित्ताने समजावण्याचा प्रयत्न करतात. परंतु, जेंव्हा आपण त्याला जुमानत नाही, तेंव्हा मात्र भगवंत (आपला बाप) आपल्या नाकाला लोणी लावून आपल्या प्रारब्धाकरवी आपल्याला चोप देतो. आता हे लोणी लावतो म्हणजे काय? तर हे लोणी म्हणजे लोकांकडून येणारी कौतुक किंवा स्तुतीची थाप.

भगवंताने इंद्रदेवाकडे सजीवांना पर्जन्य, वायू इ. योग्यवेळी देण्याची शक्ती दिली. त्यामुळे गोकुळात सर्व लोक इंद्रदेवाची पूजा करीत, स्तुती करीत. परंतु, जेंव्हा इंद्राला वाटले की मीच त्यांचा पालनहार, तारणहार आहे आणि त्याच्या अहंकाराची परिसीमा झाली तेंव्हा, भगवंताने त्याच्या नाकाला लोणी लावलं. पुढे जेंव्हा कान्होबाच्या निर्देशाने गोकुळवासियांनी त्याची स्तुती थांबवली तेंव्हा, इंद्राच्या अभिमानाची परिणती क्रोध आणि अविचारात झाली. शेवटी भगवंताने त्याचा अहंकार एका करांगुलीच्या जोरावर संपवला.

असाच अहंकार गरुडाला, सुदर्शनाला झाला तेंव्हा श्रीकृष्ण परमात्म्याने त्यांच्या नाकाला स्तुतीचे लोणी लावून त्यांना एक कामगिरी सोपवली. आणि पुढे हनुमंताकरवी त्यांचा गर्वपरिहार करून त्यांना त्यांची जागा दाखवली.

ज्ञान, कला, गुण हे सर्वथैव त्याज्य आहे असे नाही, परंतु त्या ज्ञानाला, कलेला लोकेषणेची झालर लागली की त्याच ज्ञानाची, गुणाची परिणती अहंकारात होते. लोकांनी मला ज्ञानी, गुणवान म्हणावं, लोकांनी माझं कौतुक करावं, लोकांनी माझा आदर करावा, माझ्यासमोर आणि माझ्या माघारी मला सज्जन, सात्विक, सत्पुरुष म्हणावं ही आंतरिक सुप्त इच्छा म्हणजे लोकेषणा!

स्तुती, आदर, पूज्यभाव याचे लोणी केवळ भगवंतासाठीच असते. स्तुतिप्रियः विष्णुः | परंतु, थोड्याफार कलागुणांमुळे, तोकड्या ज्ञानामुळे जेंव्हा आपण अल्पज्ञानी स्वतःला सर्वज्ञ म्हणजे पूजनीय मानू लागतो, तेंव्हा भगवंत स्वतःकडे आलेले पूजनीय, स्तुतीवचनांचे लोणी या अभिमानी तथाकथित कलावंत, गुणवंत, ज्ञानी माणसाच्या नाकाला लावतो. आणि मग बहुतांश लोक त्या अभिमानी माणसाची स्तुती, कौतुक सुरु करतात. आणि हेच स्तुतीरुपी लोणी त्या तथाकथित विद्वान, तथाकथित सज्जन भक्ताच्या अधःपतनाचे कारण ठरते.

भक्तीचे एक महत्वाचे सूत्र म्हणजे अभिमान दंभादिकं त्याज्य |. जो अभिमानरहित होऊन, दंभरहित होऊन, लोकेषणारहित होऊन साधना करतो तोच आणि केवळ तोच भक्त या पदावर आरूढ होऊ शकतो.

त्यासाठी, लौकिक स्तुती, मान यांना बळी न पडता तुकोबा म्हणतात तसे, आम्ही घ्यावे तुमचे नाम । तुम्ही आम्हा द्यावे प्रेम | हे जीवनाचे ब्रीद बनवावे.

श्रीमहाराज म्हणत, “मानाची हौस ही रक्तातली साखर आहे. ती त्या माणसाच्या जीव घेतल्याशिवाय सोडत नाही”. हे मान, कौतुकाचे लोणी अनुभवायला गोड वाटते. परंतु, हाच मधुमेह जीवघेणा आहे. ज्याच्यात थोडाही अभिमान आला, त्याच्या नाकाला भगवंत हे मधुमेहाचे लोणी लावतो. तेंव्हा, या स्तुती, मानरुपी बाहेरून गोड वाटणाऱ्या मधुमेहाला बळी न पडता मधुसूदनाचे नामरुपी लोण्याच्या मोहात पडण्याच्या अट्टाहास धरावा! कठीण वाटत असेल, पण ही सावधानता जो बाळगेल त्यालाच भगवंताचे नवनीत प्रेम मिळेल!

🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏

Monday, March 25, 2019

पू. तुकामाई चिंतन

🌸📿🌸 *"चिंतन ही तुझी सेवा"* 🌸🌿🌸

*तुकामाई माझ्या गुरूंची माऊली ।।*
*अनन्यता ज्याच्या जवळी त्याला ती पावली ।।*

*श्रीराम!*
भगवंत हा करुणासिंधु आहे असे आपण म्हणतो. परंतु, समुद्र हा कितीही मोठा असला तरी त्याला मर्यादा असते. समुद्रापेक्षा विशाल आणि सर्वव्यापक आकाश असते. भगवंताच्या करुणेपेक्षा व्यापक संतांची करुणा असते. ‘तुका झाला आकाशाएवढा’ अशी संतांची करुणा असते. अशा संतांचे आणि समर्थ सद्गुरूंचे आपल्यावर किती उपकार आहेत, याची आपल्याला कल्पना येणे कठीण आहे. आपल्या परंपरेचा विचार केला तर आपल्या सद्गुरुंपेक्षा त्यांच्या सद्गुरूंचे तुकामाईचे यांचा आपल्यावर एक विशेष उपकार आहे. आपल्याला तो उपकार वाटत नाही हा आपला दोष आहे. हा विशेष उपकार चिंतनाच्या शेवटपर्यंत कळून जाईल.

*उपकाराच्या तीन तऱ्हा आहेत: प्रतीउपकार, परोपकार आणि उपकार!*

व्यवहारी मनुष्य मला कुणी मदत केली म्हणून मीपण त्याला करायला पाहिजे असे वागतो म्हणजे प्रतीउपकार करतो; भगवंत आपण त्याला मदत केली म्हणून तो आपल्याला सांभाळतो असं नाही, पण सदाचरण राखले तर आपल्यावर तो परोपकार करतो. संत किंवा सद्गुरूंचे तसे नसते. आपल्यासारखे बद्ध विषयात बुडालेले त्यांना बघवत नाही आणि आपलं कल्याण व्हावं याच तळमळीने आपल्याला सतत निरनिराळ्या निमित्ताने सन्मार्ग दाखवत असतात. हा संतांचा निरपेक्ष, निःस्वार्थ उपकार आहे.

असे अनंत उपकार करणारे सद्गुरु लाभूनही आपण त्यांच्यावर प्रतीउपकार तर करूच शकत नाही. मात्र आपला अहं प्रबळ करून आपण त्यांच्यावर अपकार मात्र रात्रंदिवस करत असतो. माझे सद्गुरु माझ्यासाठी सर्व काही आहेत, असं म्हणणारा अनेकदा घरातील आपल्या लाडक्या व्यक्तीला जरासा ताप आला तरी त्याला उपासनेला जाववत नाही की नामाला बसवत नाही. वस्तू, व्यक्तीमध्ये आसक्त असलेला मनुष्य वाणीने जरी गुरुः साक्षात परब्रम्ह म्हणत असेल तरी सद्गुरूंच्या तुलनेत नेमकं घरच्या मंडळींना प्राधान्य देतांना दिसतो. बरं याहीपुढे जाऊन आपलं घरच्यांवरदेखील खरं प्रेम नाही असं दिसतं. घरातील मंडळींवर तथाकथित प्रेम असूनही त्यांनी काही कमीजास्त बोललं किंवा आपल्या मनाविरुद्ध वागलं तर आपल्याला ते सहन होत नाही. याचा अर्थ माझं सद्गुरुंपेक्षा माझ्या लौकिक माणसांवर आणि त्या माणसांपेक्षा माझं स्वतःवर जास्त प्रेम आहे. यालाच अहंपणा म्हणतात. आणि संतांचा उपकार याच ठिकाणी भगवंताच्या परोपकारापेक्षा श्रेष्ठ ठरतो.

कसं ते पहा: आपण कसंही वागलो तरी आपल्या घरच्या लोकांनी आपल्याशी चांगलंच वागावं ही आपली सुप्त अपेक्षा असते. आणि तसं झालं नाही तर आपला अहं दुखावतो. समोरच्या व्यक्तीचा अहं किती मजबूत आहे हे त्याची चूक नसतांना त्याचा अपमान, निंदा केल्यावर खऱ्या अर्थाने दिसून येते. तुकामाईंनी त्यांच्याकडे येणाऱ्या अनेक लोकांचा विनाकारण अपमान, शिवीगाळ करून त्यांच्या अहंची खोली आणि व्यापकता तपासली. जे त्यात अनुत्तीर्ण झाले, त्यांचा बद्ध जीव म्हणून धिक्कार केला. परंतु, गणूसारखा एक समर्पित मुलगा या परीक्षेत उत्तीर्ण झाला तेंव्हा त्याच्यातील ब्रम्हतत्व चेतन करून त्याला “ब्रम्हचैतन्य” म्हणून गौरविले. गणुबुवा हे मुळातच परब्रम्हाचं चेतन रूप होतं. तरीसुद्धा मुमुक्षू म्हणून आलेल्याला साधक आणि शिष्य बनण्यासाठी सर्वप्रथम निरहंकारी बनणे जरूर आहे. याचा धडा तुम्हाआम्हाला देण्यासाठी तुकामाईंनी गणू कितीही मनोभावे आज्ञापालन करत असला तरी त्याच्याशी विक्षिप्त वागले.

तुम्ही आम्ही आपल्या सद्गुरुंकडे अनुग्रह घेण्यासाठी गेल्यावर सद्गुरूंनी आपल्याशी असे मानहानीकारक वागले असते तर आपण म्हटलो असतो, ‘त्यांचा अनुग्रह त्यांच्याजवळ. ज्यांना सर्व जगत भगवद्स्वरूप आहे हे न कळता दुसऱ्याचा असा अकारण अपमान करावासा वाटतो, तो कसला सद्गुरु!’

आपल्याला जर असं वाटत असेल की ‘खरंच, आपल्या सद्गुरूंनी आपली अशी कोणतीही परीक्षा बघितली नाही!’ तर ते चूक आहे. आपल्यालादेखील तुकामाईच्या या परीक्षेला सामोरे जाणे अनिवार्य आहे. किंबहुना सध्या परीक्षा सुरु आहे.

तुकामाई आपल्या विक्षिप्त वागण्यातून अगोदर समोरच्या व्यक्तीचा मीपणा जाळून टाकतात आणि मग पूर्ण कृपा करतात. भगवद्प्राप्तीची खरी तळमळ असलेल्याने आपल्या घरातील, बाहेरील व्यक्तींकडून होणाऱ्या सकारण अकारण अपमान, निंदा, द्वेषयुक्त वागण्याला सहन करून आपला अहं हळूहळू नामशेष करणे अनिवार्य आहे, हा सुबोध तुकामाईंनी आपल्या विक्षिप्त वागण्यातून दिला.

अहं जाळण्याचे कार्य भगवंताच्या हातात नाही. “अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः” असं पवित्र अभिवचन देणाऱ्या भगवंताच्या मुखातदेखील अहं आहे. परंतु, सद्गुरु ‘रामराया कल्याण करील बरं बाळ!’ असं म्हणतात आणि मानतात. तेंव्हा अहंकृती, अभिमान जाळण्याचे काम फक्त सद्गुरूच करू शकतात. आणि अहंकृती जाळणे, हाच सद्गुरूंचा आपल्यावर सर्वात मोठा उपकार आहे.

आपला अहंकार दहादिशांनी पसरलेला आहे. असा दशाननी अहंकार जाळण्यासाठी आपल्याला अंतःकरणात तितिक्षा आणि मुखात भगवंताचे नाम ठेवून सदाचरण राखावे लागेल. जेंव्हा जेंव्हा आपलं काहीही चुकलं नसतांना आपल्या घरच्या मंडळींकडून, नातेवाईकाकडून, किंवा समाजातून आपल्याला नाहक त्रास दिल्या जात आहे, तेंव्हा उद्विग्न न होता तुकामाईंच्या इच्छेने श्रीमहाराज आपल्यातील अहं जाळण्याचे काम करत आहेत, हे ध्यानांत ठेवावे. असं लक्षात ठेवलं तरच मनाचा त्रागा न होता नामाला, उपासनेला बसलो की अनुसंधान टिकण्यास मदत होईल. आपल्याला मानसिक इ. क्लेश देणारी घरातील, बाहेरील मंडळी स्वतः हे करत नसून खऱ्या अनुग्रहासाठी तुकामाई त्यांच्या निमित्ताने आपली परीक्षा घेत आहेत, हा भाव दृढ करावा. अशा अकल्पित पद्धतीने आपल्यातील अभिमान हा सर्वात मोठा शत्रु मारण्याची ही रचना म्हणजे तुकामाईंचा आपल्यावर विशेष उपकार आहे.

तेंव्हा, पूर्ण सावधानतेने आपण व्यवहार आणि साधना चालू ठेवली तर आपले सद्गुरु आणि त्यांचे सद्गुरु दोघांचा कृपाशीर्वाद लाभून आपला शेवटचा श्वास पुण्यतिथी होईल!
 
*।। नमन माझे येहळेगावी गुरूतुकामाईला ।।*

🙏 *जानकी जीवन स्मरण जय जय राम* 🙏

Wednesday, February 20, 2019

पू. आनंदसागर महाराज पुण्यतिथी पर्वकाळ चिंतन


🌹🌷" नामप्रेमचिंतन " 🌹🌷

शंका- आज श्री .प पु . आनंदसागर यांची पुण्यतिथी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!! कृपया यावर थोडं चिंतन मांडावं!


श्रीराम! 
🌺 आनंदाचा सागर नयनी पहा रे गड्यांनो! 🌺

श्रीराम! आजचा दिवस आनंदाचा आहे! त्यावर चिंतन करणे जरूर वाटते. आमच्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मठ पिंपळगांव येथें १९व्या शतकांत एका कुलकर्णी कुटुंबात अनंतराव यांना एक दिव्य पुत्ररत्न प्राप्त झालं. नाव ठेवण्यात आलं, गोविंद! या गोविंदाला बालपणीच वडिलांमुळे दासबोधाची अत्यंत गोडी लागली. ६-७ वर्षाचा गोविंदा वडील दासबोध वाचू लागलें की कानाचे प्राण करून ऐकायचा. परंतु, वयाच्या आठव्या वर्षी मौंज झाल्यानंतर दोनच वर्षांत गोविंदाचं पितृछत्र हरवलं. भाऊबंधांनी सगळी संपत्ति लुबाडल्यावर इंदौरला येऊन गोविंद स्वतःचं आणि आईचं पोट भरण्यासाठी लहानपणीच थोडं काम करू लागला. प्रापंचिक तापाने पोळलेला गोविंद सतत दासबोधात रमू लागला आणि त्यातून आत्मचिंतन वाढू लागलं.

साधारण पंधरा वर्षाचा झाला असतांना एके दिवशी हा नवतरुण इंदौर येथे दासबोधात आकंठ बुडालेला होता आणि विचार करू लागला की मला या साधनेत सिद्धाचा आशीर्वाद मिळेल का?

आणि त्याचवेळी एक दिव्य महात्मा समोर येऊन हजर! भव्य शरीर, अंगात कफनी, डाव्या हातात कुबडी, उजव्या हातात तुळशीमाळ, कपाळावर केशरी त्रिपुंड. चेहऱ्यावर दया, क्षमा आणि करुणा असलेल्या या श्रीमुखातून आदेश आला, "मला येऊन भेट!"

श्रीमहाराज इंदौरमध्ये ज्याठिकाणी वास्तव्यास होते, तिथें शोधत शोधत गोविंद गेला आणि त्याच महात्म्याला बघून लोटांगण घातलें. परमानंद वाटला. दुसऱ्या दिवशी आपल्या आईला सुद्धा श्रीचरणीं आणले. सतत नामांत राहिल्यास सद्गुरूच तुम्ही असाल तिथें येतील आणि तुम्हाला अनुग्रहीत करतील! याचा प्रत्यय गोविंदाला आला. महाराजांनी गोविंदाला आईसह बडवाह येथे जाऊन साडेतीन कोटी रामनामजप करण्यास सांगितले. आणि गुरूकृपेनें व गोविंदाच्या निष्ठेनें साडेचार वर्षात हा जपसंकल्प पूर्ण झाला.
यादरम्यान श्रीमहाराजांनी या सत्शिष्याला पत्र लिहिले, त्यात गोविंदला नवीन नामभिधान दिले. ते म्हणजे आनंदसागर! चि. गोविंद अनंत कुलकर्णी हा गुरूकृपेनें 'आनंदसागर' बनला!

या प.पु. आनंदसागर महाराजांच्या पुण्यतिथीच्या पर्वकाळांत आपण हे त्यांचं पुण्यस्मरण करत आहोत. काय गंमत आहे बघा, आनंदसागर महाराजांचं नामतेज वाढलेलं बघून त्यांची आईसुद्धां त्यांना नमस्कार करू लागली. यांवर वाद होऊन दोघांनी श्रीमहाराजचरणीं आपलं गाऱ्हाणं मांडलं. श्रीमहाराज म्हंटलें, दोघांनी एकमेकांना नमस्कार करू नका!
शिष्यत्वाची दासबोधात सांगितलेली लक्षणं आनंदसागर महाराजांमध्यें कशी ठासून भरली होती, त्याचा एक छोटासा प्रसंग.... एकदां एकादशीला सकाळच्या वेळी श्रीमहाराज म्हंटलें, "आनंदसागर, तू भजन करत बस. मी जरा जाऊन येतो, मग आपण आरती करुया!" श्रीमहाराज जे बाहेर गेले ते दुसऱ्याच दिवशी आले आणि पाहतात तर यांचं भजन सुरूच! श्रीमहाराज म्हंटलें, 'शिष्य असावा तर असा!' प्रत्यक्ष सद्गुरूंकडून अशी पोचपावती मिळालेलें सत्शिष्य मोजकेच!

पुढे श्रीमहाराजांच्या आज्ञेनें आनंदसागर महाराजांनी १८९३ साली अंबड येथें तर १८९७ साली जालना येथे श्रीराम मंदीराची स्थापना केली. जालना श्रीराम मंदीराची पार्श्वभुमी ऐकण्यासारखी आहे. आनंदसागर महाराज प्रवासांत असतांना जालना येथें १८९७ साली आले होते. त्यावेळी, आजचा जो मंदीराचा आनंदवाडी परिसर आहे, तो निर्जन दाट झाडींचा गावाबाहेरचा परिसर होता. जवळचं रेल्वे स्टेशन सोडलं तर या भागांत दिवसासुद्धां जाणं भितीदायक असें. आनंदसागर महाराज गावांत न उतरता या जंगली भागांत एक लहानसं भैरवनाथाचं मंदीर होतं, तिथें उतरलें. सकाळी स्नान, संध्या, पुजादी कर्म झाल्यावर बुवा गावांत भिक्षेला जात. जाण्यापुर्वी सोबतच्या राम, लक्ष्मण, सीतेच्या लहानशा मुर्त्या भैरवनाथाच्या मुर्तीच्या खालच्या पायरीवर ठेवत....
एके दिवशी त्यांनी पाहिलं की, रामरायाची मुर्ती वरच्या पायरीवर आणि भैरवनाथाची मुर्ती खाली! त्यांना वाटलं आपलं चुकलं असेल. म्हणून त्यांनी मुर्त्या आपापल्या जागेवर ठेवल्या. परंतु, दुसऱ्या दिवशी तोच प्रकार घडला.
मग त्यांनी गोंदवल्याला श्रीमहाराजांना पत्र लिहून सर्व वृत्तांत सांगितला. श्रीमहाराजांचं उत्तर आलं, ही रामेच्छा दिसत आहे. असं करूया त्याठिकाणी श्रीराम मंदीर स्थापनेची तयारी करावी. रामरायाची भव्य मुर्ती घेऊन आम्ही जालन्याला येऊ आणि थाटांत श्रीरामस्थापना करू!
अशाप्रकारे, १८९७ साली रामराया नामावतारी श्रीमहाराजांच्या हस्ते जालना येथे विराजमान झालें.
राघोबा उदारा ये माझ्या मंदीरा ।
जानकीच्या वरा रामराया ।।
आनंदसागर महाराजांनी रामाचा, नामाचा सुरू केलेला हा आनंदोत्सव आजपर्यंत सुरू आहे....

 तर पुढे ब्रम्हानंद महाराजांप्रमाणें आजन्म ब्रम्हचर्य पालन करून रामसेवा करावी, अशी आंतरिक इच्छा असतांना श्रीमहाराजांनी आनंदसागर महाराजांना प्रपंच थाटण्याची आज्ञा दिली!
पत्नी, एक मुलगी, आई यांच्यासह आनंदसागर महाराजांनी जालना श्रीराम मंदीर भिक्षेवर आणि नामप्रेमाने मोठं केलं. त्यांना लोकांना अनुग्रह देऊन नामप्रसार करावा, अशी गुरूआज्ञा मिळाली होती. परंतु, त्यांनी फारच कमी लोकांना अनुग्रह दिला. कुणी अनुग्रहासाठी आला तर ते म्हणत, 'माझा अनुग्रह घेतला तर तुझ्या मुलाला वेड लागेल, तुझी पत्नी मरेल. चालेल का?' आणि फारच तयारीचा निघाला तर अनुग्रह देत नाही तर त्याला गोंदवल्याला पाठवत!
त्यांच्याकडे असा एक तयारीचा शिष्य अनुग्रहासाठी आला असता, त्यांनी त्याला स्वतः गोंदवले येथे श्रीमहाराजचरणीं आणलं आणि त्यांच्याकडून अनुग्रह देवविला. हा सत्शिष्य म्हणजे प.पु. रामानंद महाराज उर्फ पांडुरंगबुवा! आनंदसागर महाराजांनी रामानंदांना अनुग्रह दिला नाही परंतु आपली कन्या देऊन त्यांना जावई मात्र बनवलं! काय लीला असतात भगवंताच्या! अनिर्वचनीय!

कालांतरानें, १९०५ मध्यें आनंदसागरांना गोंदवल्याहून श्रीमहाराजांचं बोलावणं आलं. आणि मग बुवा २-३ महिने गोंदवले येथे सद्गुरूंच्या सेवेत राहिले...
१९०७ मध्यें आनंदसागर महाराज जालन्याहून विदर्भातील नांदुरा नावाच्या गावाला निघाले. निघतांना आईला नमस्कार केला, तर आईंना विचित्र वाटलं, त्या म्हंटल्या, 'गोविंदा, आज काय हे असं?' त्यादिवशी नांदुरा येथें आनंदसागर महाराज भजनाला बसलें, बेंबीच्या देठापासून एक अभंग गायला, "स्वामी माझा पाहिला या माणगंगातिरी". हे पद म्हणतांना तन, मन, जीव, प्राण गहिवरून गेलं होतं. भजन झाल्यावर डोळे लावून ध्यानस्थ बसलें. चंद्रग्रहण होतं. ग्रहण सुटल्यावर जवळच्या लोकांना म्हंटलें, 'मी आता जातो. बोलावणं आलं आहे. महाराज तुमचें कल्याण करतील!'
एवढं सांगून 'महाराज, राम, महाराज' हे तीन शब्द उच्चारून या आनंदाच्या सागरानें देह रामापायीं समर्पित केला....!
त्यांच्या आईंना ही बातमी समजल्यावर त्या म्हंटल्या, 'रडता काय रे मेल्यांनो! भजन करा म्हणजे त्याचा आत्मा संतुष्ट होईल!' आणि श्रीमहाराजांना ही वार्ता कळली तेंव्हा ते म्हंटले, "माझा उजवा हात गेला!"
धन्य ते सद्गुरू, धन्य ती आनंदसागराची महामाता आणि धन्य तो अनन्य भक्तीचा 'आनंदसागर'!

आजच्या या पावन पर्वकाळांत सद्गुरूंनी दिलेलं नाम घेत,
 आनंदाचा सागर नयनी पहा रे गड्यांनो! 


    ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)
!!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!!